नेमेची येतो मग पावसाळा!

ह्यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. भविष्यात पाणी टंचाईचा त्रास होऊ नये म्हणून राज्यात जलसंवर्धनाची मोहीम हाती घेतली जात आहे. भूजलस्तर उंचावण्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे घोष वाक्य झाले आहे. पण त्याचबरोबर मुंबई सारख्या महानगरात पावसाचे पाणी तुंबून वाहतूक ठप्प होणे; तुंबलेले पाणी घरा-दुकानात शिरून वित्तहानी काही वेळा जीवितहानी होणे, ह्या समस्यांकडे देखील गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 

पावसामुळे मुंबई ठप्प! पावसाचे पाणी रेल्वेमार्गावर आणि रस्त्यांवर साचल्यामुळे वाहतूक बंद! असे मथळे काही मुंबईला आणि मुंबईकरांना नवीन नाहीत. काही चाकरमानी आयत्या मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेतात पण कित्येकांचे हातावर पोट आहे त्यांनी काय करावे? कामावर जायला निघालेले असून वाटेत अडकून कामावर न पोहचू शकल्यामुळे अनेकांचे पगार कापले जातात, त्यांनी काय करावे? रोजगार उद्योगधंदे ह्यावर किती परिणाम होतो, आर्थिक नुकसान किती होते, काहीवेळा जीवित हानी देखील होते, ह्या गोष्टींचा विचार कोणीच करताना दिसत नाही. ह्या घटना दरवर्षीच्या आहेत. ह्या अशा दुर्घटना टाळण्यासाठी, पावसाळा सुरु होण्याआधीच मुंबई महापालिका, राज्यसरकार, रेल्वे प्रशासन ह्यांनी नागरिकांच्या सहकार्याने काम करून ह्या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.

सरकारने विशेषतः केंद्रीय रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू ह्यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे; एकवेळ नवीन गाड्या नका वाढवू पण आहेत त्या व्यवस्थित चालू शकतील ह्याकडे लक्ष दिले पाहिजे; हे दरवर्षीचे गोंधळ आहेत. २-४ तास सलग पाऊस पडला कि रेल्वे ठप्प होते, आणि पर्यायाने रस्त्यावरील वाहतूक वाढते पण रस्त्यांची देखील तीच अवस्था आहे, सगळीकडे वाहतुक ठप्प होते; कुठे गुडघाभर तर कुठे कमरेपर्यंत पाणी साचते; थोड्याश्या पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही, हि कसली नागरी सुव्यवस्था? पाण्याचा निचरा होऊ शकेल अशी गटारे धड नाहीत, लगेच तुंबतात? हे असे थोड्याश्या पावसात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होऊ नये ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची? आमदारांची कि स्थानिक नगरसेवक ह्यांची? राज्य सरकारची कि महापालिकेची? त्यांची तर आहेच पण सगळ्यात जास्त जबाबदारी आहे ती नागरिकांची! पाण्याचा निचरा करणारी गटारे उगाच तुंबत नाहीत, नागरिकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर घन कचरा त्यात अडकतो म्हणून तुंबतात. रस्त्यांवर आणि विशेषतः रेल्वेमार्गांवर कचरा आपसूक निर्माण होत नाही, तो नागरिकांनीच केलेला असतो. वर्षभर त्या बाबतीत बेफिकीरीने वागले की त्यांची किंमत पावसाळ्यात अशा पद्धतीने चुकवावी लागते. रस्त्यात थुंकू नये, कचरा टाकू नये, लोकलमध्ये आणि लोकलमधून कचरा टाकू नये ह्याचे कोणालाही भान नसते. बिनदिक्कतपणे कुठेही काहीही फेकले जाते.

“थुंकू नये” “कचरा टाकू नये” अशा सूचना लिहाव्या लागतात ह्यातच नागरिकांच्या सुजाणतेचा बोजवारा उडालेला दिसून येतो. आणि तेही स्वाभाविकच आहे म्हणा, शालेय अभ्यासक्रमात देखील नागरिकशास्त्र हा फक्त वीस गुणांचा विषय असायचा, अन् तो देखील ऑप्शनला टाकला तरी चालायचे. सध्यातर नागरिकशास्त्र हा विषयच नाहीये म्हणे. पालकांनी आणि शिक्षकांनीच हा विषय ऑप्शनला टाकलेला असेल तर नव्या पिढीला कोण आणि काय शिकवणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? 

 

वेद आणि विज्ञान – २

देवांच्या पूर्वी अव्यक्तापासून व्यक्त सृष्टी निर्माण झाली, ह्यात एकाला अव्यक्त मानले आहे. अनेक ऋषीमुनींनी अशा प्रकारची मते मांडली पण सर्वांचे मूळ एकच असावे असे मानले जाते. वेदांचा महत्वाचा सिद्धांत ह्या एकाशी निगडीत आहे.

सुरवातीला चित्रांकित अक्षर / संख्या वाचन होत असे. नंतर संख्येसाठी अक्षरे वापरली जाऊ लागली, जसे क = १, ख = २ ग = ३ इत्यादी. शब्दांनी संख्या मांडण्याची पद्धत देखील होती. ही पद्धत फार महत्वपूर्ण होती; आकाश = ०, पृथ्वी किंवा धरा = १, नेत्र = २ काळ = ३ (वर्तमान, भूत आणि भविष्य), वेद = ४, बाण / महाभूते = ५, रस / वेदांग /ऋतु = ६, पर्वत / ऋषी, सूर्याचे घोडे = ७, गज / वसु = ८, नवग्रह = नऊ, रुद्र = ११, सूर्य = १२, विश्वे = १३, विद्या = १४, तिथी = १५, कला = १६, अंतेष्टी = १७, श्रुति = १८, अतिधृती = १९, नखे = २०; अशाप्रकारे अंक लिहिताना अंकानाम् वामतो गतिः| हे सूत्र वापरले जात असे; आकाश-वेद-रस-वसू असे लिहिलेले असेल तर आकड्यांमध्ये ती संख्या म्हणजे ८६४०.

नऊ ह्या संख्येनंतर एकाच्या पुढे शून्य मांडून दहा ह्या संख्येचा विचार झाला, शोध लागला; दशमान पद्धतीचा शोध लागला; मोठाल्या संख्या लिहिता येऊ लागल्या; दहाच्या पटीत लिहिता येऊ लागल्या, त्यापद्धतीने त्यांची कोष्टके तयार होऊ लागली. आकड्यांचा हा शोध वेदपूर्व काळातील असला पाहिजे. त्याकाळातील भारतीय तज्ञ परार्धा (१०१८) पर्यंतची गणिते करत असत.

काळ मापनाचे हे कोष्टक पहा

परमाणु = १/३०३७५ सेकंद

२ परमाणु = १ अणु = ८/१२१५०० सेकंद

३ अणु = त्रीरेणु = ८/४०५०० सेकंद

३ त्रीरेणु = १ त्रुटी = ८/१३५०० सेकंद

१०० त्रुटी = १ वेध = ८/१३५ सेकंद

३ वेध = १ लव = ८/४५ सेकंद

३ लव = १ निमेश = ८/१५ सेकंद

३ निमेश = १ क्षण = ८/५

५ क्षण = १ कण = ८ सेकंद

१५ कण = १ लघु = १२० सेकंद = २ मिनिटे

१५ लघु = १ नाडी = ३० मिनिटे

२ नाडी = १ मुहूर्त = ६० मिनिटे = १ तास

३ मुहूर्त = १ प्रहर = ३ तास

८ प्रहर = १ अहोरात्र = २४ तास

३० अहोरात्र = १ महिना

६ महिने = १ अयन

२ अयन = १ वर्ष

अशा पद्धतीने उपयुक्तते नुसार निरनिराळी कोष्टके बनवलेली असत. गणित शास्त्र इतके विकसित असेल तर इतर शास्त्रेही तशाच प्रकारे विकसित झाली असली पाहिजेत. कण्व गोत्री मेधातिथीने ऋग्वेदात गणिताचा विचार प्रथम मांडला. अर्थात गणिताचा विकास त्याच्याही बराच आधी झालेला होता. मेधातिथीने संख्यांचा विचार परार्धापर्यंत (१०१८) नेला. ऋग्वेद आणि यजुर्वेदात त्याचे उल्लेख आढळतात. मेधातिथी बरोबरच आणि त्याच्या नंतरच्या काळात अनेक ऋषींनी गणिताच्या विकासाला हातभार लावला आहे. देवातिथी, ब्राह्मातिथी, वत्स, पुनर्वास्त, सासकर्ण, प्रगथ, परवत नारद, गोसुक्त, अश्वसुक्ती, इरमाभिती, सौभारी, निपार्तिथी, नभक, त्रिशोक, श्रुतीगु, आयु, मेध्या, मातरीश्व, कृश, परशधरा, सुपर्णा, कुरुसुति, कुशिदी, प्रासकण्व इत्यादी गणित तज्ञांची नावे आढळतात.

वेदांमध्ये दहा व त्यापटीत येणाऱ्या संख्यांचा अगदी परार्धा पर्यंतच्या संख्यांचा विचार मांडला आहे. त्यागोदर मोठ्या संख्या ह्या चित्रवल्ली, शब्दवल्लीत सर्व जगभर मांडल्या जात असत. दशमान पद्धतीने संख्या मांडणे फार सोपे झाले आणि त्याचे श्रेय हे ह्या मेधातिथीचे आहे. एकावर शून्य लिहून नऊच्या पुढे संख्या मांडण्याची दशमान पद्धत ही भारताने जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे.

(क्रमशः)

वेद आणि विज्ञान – १

आपल्या संस्कृतीतील अनेक गोष्टींकडे पुराणातील वांगी (वानगी) म्हणून,दुर्लक्ष करण्याची प्रथा बोकाळलेली आहे. आजच्या विज्ञानाला ठाऊक झालेल्या काही गोष्टी, वेद पुराणांमधून उल्लेखलेल्या आहेत असे म्हंटले कि लगेच समोरून थट्टेचा, कुचेष्टेचा सूर लागतो. अर्थात त्यामध्ये टीका करणाऱ्यांचा संपूर्ण दोष आहे असेही म्हणता येत नाही. वेद, उपनिषदे, पुराणे ह्यांच्याकडे फक्त धर्मग्रंथ म्हणूनच पहिले गेले. त्यात सांगितलेल्या अनेक गोष्टींमागे काहीतरी वैद्यानिक कारण असेल असा विचार सहसा कोणी करत नाही. मध्यंतरी काही सुहृदांबरोबर झालेल्या चर्चेतून ह्या संदर्भात अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याचबरोबर काही मौलिक ग्रंथ देखील अभ्यासासाठी मिळत गेले. संशोधन करणे, संदर्भ मिळविणे, संकलन करणे, चिकित्सक अभ्यास करणे, विश्लेषण करणे अशा मार्गांनी ज्ञानवृद्धी होत असते; ह्याच पद्धतीने मिळत गेलेल्या लेखांचा, ग्रंथांचा अभ्यास करून, हा विषय संक्षिप्त रुपात मांडत आहे. वेदांमधून जे ज्ञान मिळते ते फार प्राचीन आहे. हजारो वर्षांपूर्वी पासूनचा हा वारसा आहे. हा वारसा जपला पाहिजे, जोपासला पाहिजे एवढीच माझी धारणा आहे. 

वेदातील विज्ञानाचा शोध घेताना गणित, धातूशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान शास्त्र आणि आयुर्वेद ह्यासंदर्भात जी माहिती मिळाली आणि जी माझ्या अल्पमतीला समजली असे मला वाटते ती ह्या लेखमालेतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 

काही हजार वर्षांपूर्वी, उपनिषदांच्या रूपाने छंदोबद्ध रचनांमधून वेदांमधील ज्ञान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवले. ज्ञान समाजात खोलवर पोहोचले त्यामुळे लोकं नीतिनियमाने, धर्माने वागू लागली पर्यायाने सर्वत्र सुख शांती नंदू लागली.

सर्वेपि सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामयाः || सर्वे भद्राणि पश्यन्तु | मा कश्चित दुःखमाप्नुयात् ||

भारतीय प्राचीन वाङ्मयात ज्ञानाचे भांडार आहे. पाणिनी ह्यांनी लिहिलेला, भाषेला व्याकरणाचे नियम असतात हे समजावून देणारा पहिला ग्रंथ आहे; पदार्थ विज्ञान शास्त्र आहे; रसायन शास्त्र आहे; मापनाच्या कोष्टकांनी भरलेले अंकगणित आहे, ज्यामुळे विज्ञानाचा अभ्यास सोपा झाला, प्रचंड मोठ्या संख्या सोप्या पद्धतीने लिहिता येऊ लागल्या, बीजगणित, रेखागणिता सारख्या गणिती शास्त्रांचा विकास झाला. ह्या सर्व गोष्टी वेद, उपनिषदे, पुराणे, अरण्यके, ब्राह्मणके इत्यादी ग्रंथातून सोप्या काव्यमय भाषेत मांडलेल्या आहेत. 

(क्रमशः)